6 April 2014

साखरेवर चालणारी बॅटरी

वैज्ञानिकांनी आता जैविकदृष्टय़ा विघटनशील असलेली विजेरी (बॅटरी) तयार केली असून ती साखरेवर चालते. चार्जिग न करता ती प्रदीर्घ काळ चालू शकते. येत्या तीन वर्षांत आपले सेलफोन, टॅबलेट, व्हिडीओ गेम व अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी लागणारी ऊर्जा या बॅटरीतून मिळू शकेल. व्हर्जिनिया टेक या संस्थेच्या संशोधक पथकाने ही बॅटरी तयार केली असून तिची ऊर्जा घनता जास्त आहे. त्यामुळे ती आपल्या नेहमीच्या बॅटरींपेक्षा वेगळी आहे. ही बॅटरी स्वस्त, पुनर्भरणयोग्य व जैविकदृष्टय़ा विघटनशील आहे. साखरेवर चालणाऱ्या बॅटऱ्या नाहीत असे नाही पण ही बॅटरी जास्त ऊर्जा घनतेची असल्याने ती जास्त काळ चालते. कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर अँड लाइफ सायन्सेस या संस्थेतील जैवयंत्रणा अभियांत्रिकी संस्थेचे सहाय्यक प्राध्यापक वाय. एच. पेरसिवल झांग यांनी सांगितले की, साखर हा ऊर्जेचा साठा करणारे संयुग आहे. त्यापासून पर्यावरणस्नेही मार्गाने नैसर्गिकरीत्या ऊर्जा मिळवता येते. सध्या आपण ज्या बॅटऱ्या म्हणजे सेल वापरतो ते कचऱ्यात जातात व नंतर प्रदूषण करतात ती हानी यात टळणार आहे. झांग व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनैसर्गिक म्हणजेच कृत्रिम विकरात एक अशी मार्गिका तयार केली ज्यात साखरेचा सर्व विद्युतभार काढून घेतला जातो व त्याच्या मदतीने वीज तयार केली जाते त्याला एनझायमेटिक फ्यूएल सेल (विकरांवर आधारित इंधन घट) असे म्हणतात. कमी किमतीचे जैव उत्प्रेरक असलेली विकरे वापरून यात स्वस्तात ऊर्जा निर्मिती होते. पारंपरिक बॅटऱ्यांमध्ये प्लॅटिनम या महागडय़ा धातूचा उत्प्रेरक म्हणून वापर केला जातो. इंधन घटांप्रमाणेच साखरेच्या या बॅटरीत माल्टोडेक्सट्रिन या पॉलिसॅकराइडचा वापर केला जातो ते स्टार्चचे हवेशी अंशत: हायड्रोलिसिस करून मिळवतात त्यातून वीज तयार होते व पाणी हे उपउत्पादन त्यात असते ज्याने प्रदूषण होत नाही. यात साखरेच्या द्रावणातील विद्युतभारित इलेक्ट्रॉन हे हळूहळू विकरांच्या मार्फत सोडले जातात. हायड्रोजन इंधन घटात व मेथॅनॉल इंधन घटांपेक्षा या बॅटरी वेगळ्या आहेत कारण यात साखरेचे द्रावण हे स्फोटक किंवा ज्वालाग्राही नसते. ही बॅटरी बनवण्यासाठी जी विकरे व इंधने वापरतात ती जैवविघटनशील असतात. ही बॅटरी पुनर्भरणयोग्य असून त्यात पिंट्ररच्या कार्टिजमध्ये शाई भरतात तशी येथे साखर टाकली जाते, नेचर कम्युनिकेशन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

मालवेअरपासून संरक्षण

मालवेअरपासून संरक्षण
तुमच्या अँड्रॉइड फोनचे नियंत्रण मालवेअरमुळे हॅकर्सच्या हाती जाऊ शकते, ते जाऊ नये यासाठी एक नवीन साधन संशोधकांनी विकसित केले आहे. नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी पूर्वीच्या 'सी' प्रोग्रॅमिंग लँग्वेज संकेतावली लिहिण्यात सुधारणा केली आहे, कारण त्यातील वैगुण्याचा वापर करून मालवेअर तयार केले जाते. अँड्रॉइडचे बरेचसे अ‍ॅप्लिकेशन हे 'जावा' भाषेत लिहिलेले असतात, मालवेअरमुळे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या मोबाइलमध्ये हॅकर्सला तुमच्या स्मार्टफोनचा ताबा घेण्याची संधी मिळते. ते टाळण्यासाठी 'प्रॅक्टिकल रूट एक्सप्लॉइट कंटेन्मेंट' हे नवीन सुरक्षा साधन तयार करण्यात आले असून सध्याच्या दोष सुधारणा पद्धतीत त्यामुळे बदल करण्यात आले आहेत. समजा, तुम्ही 'अँग्री बर्ड' हा गेम डाऊनलोड केला तर या साधनाच्या मदतीने डेटाबेसशी तो ताडून पाहिला जातो व तो नेमका कसा चालला पाहिजे याची आधीच चाचपणी केली जाते. जर त्यात काही दोष असेल तर तो लगेच ओळखला जातो. जर ते मालवेअर असेल किंवा हानिकारक नसलेले पण तरी वेगळेच अ‍ॅप्लिकेशन असेल तर ते रोखले जाते. कुठलेही अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करताना त्यात मालवेअरचा समावेश आहे की नाही हे आधीच ओळखून ते रोखले जाते. यातील संशोधक डॉ.विल एंक यांनी सांगितले की, 'सी' भाषेच्या संकेतावलीवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे, कारण अँड्राइड रूट एक्सप्लॉइटस हे त्या भाषेत लिहिले जातात. त्यामुळे 'फॉल्स पॉझिटिव्हची संख्या कमी होण्यास मदत होईल,' असे डॉ. हेलन ग्यू यांनी सांगितले. अ‍ॅप्लिकेशन वर्तनचा डेटाबेस तयार करण्यासाठी गुगल प्ले व इतर विक्रेत्यांशी सहकार्य करण्याचा विचार आहे. अनेक अ‍ॅप विक्रेते त्यांच्या उत्पादनाची मालवेअर नाही हे तपासण्यासाठी छाननी करतात पण मालवेअर प्रोग्रॅमर्स फार हुशार आहेत; ते या छाननीत सापडणार नाहीत अशा पद्धतीने मालवेअर लपवतात व जेव्हा वापरकर्ता ते डाऊनलोड करतो व स्मार्टफोनवर पाहतो तर मालवेअर त्यात आलेले असते. प्रत्येक अ‍ॅपच्या सुरळीत वर्तनाचा डेटाबेस तयार करण्यात येणार असून तो पीआरईसी सॉफ्टवेअरमध्ये समाविष्ट केला जाईल, पण त्यात कंपन्यांच्या छाननी प्रक्रियेवर कुठलाही परिणाम मात्र होणार नाही, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
राजस्थानातही फुलांचे नंदनवन
राजस्थान म्हटले की डोळ्यांसमोर येतो वाळवंटी भाग. रखरखीत ऊन. पण आता या राज्यातही लवकरच एक आल्हाददायक रूप दिसणार आहे. राजस्थानातील काही निवडक जिल्ह्य़ांत शोभेच्या फुलांची लागवड केली जाणार आहे. आर्किड, बर्ड पॅरेडाइज, अंथुरियमसारखी फुले राजस्थानचं रूपडं आणि अर्थव्यवस्थाही पालटणार आहेत. झेंडू, गुलाब, जस्मीन यांसारखी फुले राज्यात आताही आहेत, पण ती काही भागापुरती मर्यादित आहेत. आता जयपूर, बरण, बुंदी, सिरोही-अल्वर, अजमेर यांसारख्या भागांत जरबेरा,  बर्ड पॅरेडाइज, रजनीगंधा, टय़ुलिप, लिलियम, आर्चिड, अंथुरियम या शोभेच्या फुलांची लागवड होणार आहे. विवाह समारंभ व इतर छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमातही फुलांची मागणी मोठी असते. ती राज्यातील फूल उत्पादकच पूर्ण करतील. त्यासाठी शेतक ऱ्यांना फुलझाडांच्या शेतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. राजस्थानातील फुले राज्याबाहेरही विकण्याचा प्रस्ताव आहे. जयपूर-दिल्ली महामार्गावर बेररोर येथे दोन महिन्यांत लिलियम व टय़ुलिप फुलांची बागच ४० हेक्टर क्षेत्रावर फुलवली जाणार आहे. नेहमीच्या काळात जयपूरच्या बाजारपेठेत ५० हजार किलो इतकी फुलांची मागणी असते.
सध्या पुष्कर, जयपूर, कोटा, भरतपूर या भागांत फुलझाडांची लागवड करण्यात येते. पुष्कर हा भाग गुलाबाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. सध्याच्या फुलझाडांच्या शेतीतून शहरातील मंदिरे व राज्यातील फुलांची गरज भागवली जाते. पुष्करचे गुलाब अजमेर दग्र्याच्या बाजारात जातात. झेंडू व इतर फुले मथुरा, वृंदावन व वाराणसी या उत्तर प्रदेशातील भागात जातात.
'शक्तिमान' यंत्रमानव
यंत्रमानव क्षेत्रातील प्रगती दिवसेंदिवस वाढते आहे. यंत्रमानव अनेक जोखमीची कामे करतात. इटलीच्या परसेप्च्युअल रोबोटिक्स लॅबोरेटरी या प्रयोगशालेने 'बॉडी एक्सटेंडर' नावाचा महायंत्रमानव तयार केला आहे. तो एका हातात ५० किलो वजन उचलू शकतो. सामान्य माणसापेक्षा त्याची शक्ती दहापटीने अधिक आहे. हा यंत्रमानव तुम्ही अंगावर परिधान करून शक्तिमान होऊ शकता. पेरक्रो प्रयोगशाळेचे फॅबियो सालसेडो यांनी या यंत्रमानव प्रकल्पाचे नेतृत्व केले आहे. यात मानवी शरीराच्या गुंतागुंतीच्या हालचालींचे अनुकरण तर केले आहेच पण त्याची शक्तीही दहापट आहे. त्याचे हात-पाय धातूच्या चौकटीत बसवलेले असून पाठीला नाळेसारखी केबल जोडलेली आहे. हा यंत्रमानव विद्युत मोटारीवर चालतो. विमान उत्पादन किंवा इतर गुंतागुंतीच्या कामात या लवचीक यंत्रमानवाचा उपयोग होतो. भूकंपाच्या वेळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठीही या यंत्रमानवाचा उपयोग होतो. शिवाय, ज्या व्यक्तीला बाहेर काढायचे त्याला कुठलीही इजा होऊ न देता तो तिला बाहेर काढतो. तर असा हा शक्तिमान यंत्रमानव केवळ वजन उचलण्याच्याच कामाचा आहे, असे नाही तर माणूस करू शकणार नाही इतक्या लवचीकतेने तो गुंतागुंतीची कामेही करतो.
डीएनएवर शेक्सपिअरचे सुनीत काव्य
ब्रिटनमधील प्रख्यात समीक्षक सॅम्युअल जॉनसन यांनी विल्यम शेक्सपियरची नाटके म्हणजे जीवनाचा आरसा आहेत, असे म्हणून ठेवले आहे, पण आता ब्रिटिश वैज्ञानिकांनी त्याची १५४ सुनीते (एक काव्यप्रकार) डीएनएच्या सूक्ष्मधाग्यात संचित केली आहेत. एक प्रकारे हा आरसा त्यांनी प्रत्यक्ष जीवनाशीच एकरूप केला आहे. युरोपियन बायोइनफॉम्रेटिक्स इन्स्टिटय़ूटच्या इवान बिरनी व निक गोल्डमन यांना पबमध्ये बीअर पिता पिता ही कल्पना सुचली. आपण माहिती साठवण्यासाठी हार्ड ड्राइव्ह वापरतो पण त्यात बरीच वीज खर्च होते, त्यापेक्षा ही माहिती डीएनएमध्ये साठवली तर किती बरे होईल अशी ती कल्पना होती. डीएनए हा निसर्गाचा हार्ड ड्राइव्ह आहे व त्यात रासायनिक भाषेत माहिती साठवलेली असते. ए, सी,जी, टी या न्यूक्लिओटाइडमधून ती साठवता येते. ही न्यूक्लिओटाइड्स अनेकविध प्रकारे रचल्यानंतर पेशींना त्यातून वेगवेगळ्या सूचना मिळतात. ३ अब्ज अक्षरांचा मिळून मानवी जनुकीय संकेत आराखडा बनतो. संगणकातील हार्ड ड्राइव्हपेक्षा हा डीएनएचा नसíगक हार्ड ड्राइव्ह फार आटोपशीर असतो. डीएनएमध्ये डिजिटल माहिती साठवणे हे गोल्डमन व सहकाऱ्यांपुढे आव्हान होते. दुसरी बीअर घेता-घेता त्यांनी नॅपकिनवर हे कसे करता येईल त्याचे उत्तर लिहायला सुरुवात केली. त्यांनी शेक्सपिअरच्या सुनीतांची टेक्स्ट फाइल बनवून ती संगणकाच्या मूळ ० व १ च्या भाषेतून डीएनएच्या ए, सी,जी, टी या अक्षरांच्या संकेतावलीत रूपांतरित केली. मार्टनि ल्यूथरचे 'आय हॅव अ ड्रीम' हे प्रेरणादायी भाषणही असेच डीएनए संकेतावलीत लिहिले. हा सगळा ऐवज त्यांनी अँजिलेंट टेक्नॉलॉजीज या जैवतंत्रज्ञान कंपनीला पाठवला, त्यांनी डीएनए संश्लेषण पद्धत वापरून ती माहिती भरली. मानवाने आतापर्यंत केलेले सर्व लिखाण म्हणजे अंदाजे ५० अब्ज मेगाबाइट्स जर डीएनएमध्ये भरायचे ठरवले तरी त्याचे वजन ग्रॅनोला बारपेक्षा कमी भरेल. फक्त त्यासाठी खर्च मात्र जास्त येईल एका मेगाबाइटला १२,४०० डॉलर इतका प्रचंड खर्च त्यात येईल. त्यामुळे सध्या तरी डीएनए संश्लेषण तंत्राने माहिती साठवणे महागडे आहे. पण डीएनए संश्लेषणाचा खर्च दिवसागणिक कमी होत असल्याने कालांतराने माहिती साठवणुकीसाठी हे तंत्र सहज वापरता येईल, माहिती साठवण्यासाठी क्लाउड कॉम्प्युटिंग किंवा हार्ड ड्राइव्हचे ढीग मांडून बसावे लागणार नाही, अगदी आटोपशीर पद्धतीने माहिती साठवता येईल.
पाण्यापासून वाइन
मध्यंतरी आपल्याकडे धान्यापासून वाइन तयार करायची की नाही, यावरून बरीच वाद-चर्चा झाली होती. पण 'वाइन म्हणजे दारू' असा समज करून देण्यात आल्याने द्राक्षापासून वाइन करण्याच्या उद्योगालाही त्यात फटका बसला. आता वैमानिकांनी पाण्यापासून वाइन तयार करण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे. मिरॅकल मशीन नावाने प्रसिद्ध असलेल्या या यंत्रात तीन दिवसांत पाण्यापासून वाइन बनते फक्त त्यात काही घटक मिसळावे लागतात. ही वाइन
२ डॉलरला उपलब्ध होत आहे. नेहमीची वाइन तयार करण्यास २० डॉलर खर्च येतो. मिरॅकल मशीनमध्ये आंबविण्याची प्रक्रिया करणारा एक कक्ष असतो. त्यात पाणी व द्राक्षाचा अर्क यिस्ट व विशिष्ट प्रकारची पूड टाकली, की तीन दिवसांत आपोआप वाइन तयार होते. या आंबवण्याच्या कक्षात विद्युतसंवेदक, ट्रान्सडय़ुसर्स, हीटर, पंप्स वापरून योग्य स्थिती निर्माण करून मिश्रण आंबवले जाते. यात ब्ल्यूट्रथच्या माध्यमातून एक अ‍ॅपही वापरले जाते ते या वाइन बनविण्याच्या प्रक्रियेचे नियंत्रण करते. तुमच्या आवडीची वाइन निवडण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. तुम्हाला हव्या त्या घटकांची वाइन तुम्ही करू शकता. यात जी पूड वापरली जाते त्यात ग्रोक व इतर स्वाद असतात त्यामुळे ही वाइन जुनी असल्याचा आभासही निर्माण करता येतो. २४ किंवा त्याहून थोडय़ा अधिक तासांनी याला जोडलेले अ‍ॅप तुम्हाला वाइन तयार झाल्याची पूर्वसूचना देते. या वाइन बनविण्याच्या यंत्राची किंमत ४९९ डॉलर्स आहे. वाइनतज्ज्ञ केव्हिन बॉयर यांनी हे यंत्र बनविले आहे. बॉयर यांनी नापा व्हॅलीत वायनरी स्थापन केली आहे. न्यूयॉर्क येथे राहणारे ब्रिटिश उद्योजक फिलीप जेम्स यांचे सहकार्यही या वाइन यंत्रनिर्मितीत  लाभले आहे.

स्वस्त फोनची मस्त दुनिया

मोबाइल घ्यायचा म्हटलं की त्याच्या स्पेसिफिकेशन्सच्याही आधी आपण आपले बजेट ठरवतो आणि मग त्यानुसार मोबाइलची निवड करीत असतो. असे करत असताना आपल्याला परवडणाऱ्या मोबाइल्सची यादीच आपल्यासमोर येते. पण त्याचा ब्रँड नावाजलेला नसतो. अशावेळी आपल्या मनात धस्स होतं आणि हा फोन घ्यायचा की नाही असा प्रश्न आपल्याला पडतो. फोन्सची निवड करत असताना काय काळजी घ्यायची, ते काही पर्याय आज आपण पाहू या.
भारतात मोबाइलचा वापर वाढत आहे हे काही नव्याने सांगणे गरजेचे नाही. पण यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे ती म्हणजे अनेक भारतीय कंपन्या मोबाइल उत्पादन क्षेत्रात उतरल्या. याचा फायदा असा झाला की मोबाइलच्या किमती कमी झाल्या. यामुळे सामन्यांच्या खिशातही जास्त सुविधा असलेला मोबाइल दिसू लागला. आंतरराष्ट्रीय माहिती मंडळाने संकलित केलेल्या माहितीनुसार भारतीय ब्रँडची विक्री गेल्या वर्षांत कमालीची वाढली आहे. भारतीय कंपन्या मायक्रोमॅक्स आणि कार्बन यांनी सन २०१३ मध्ये मोबाइल मार्केटमध्ये ३२ टक्के आपला वाटा नोंदविला आहे. यामुळे बडय़ा कंपन्यांच्या स्थानाला काही धक्का बसला नसला तरी त्यांची विक्री मात्र कमी झाली आहे. याच भारतीय कंपन्या येत्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी एस ४ मध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा मायक्रोमॅक्सच्या कॅन्व्हास एचडीमध्ये मिळतात. याची किंमत १५ हजापर्यंत असल्यामुळे जास्त सुविधा आणि कमी पसे अशी गणिते असलेले ग्राहक मायक्रोमॅक्सचा पर्याय स्वीकारतात. यामध्ये सध्या कार्बन, लावा, इंटेक्स, आयबॉल, झोलो, सेलकोन, जोश अशा कंपन्याही बाजारात आल्या आहेत. त्यांचेही विविध फोन मार्केटमध्ये येत असल्यामुळे अनेकांना ते पर्यायही योग्य वाटत आहेत. हे सर्व पर्याय चिनी मोबाइलपेक्षा चांगले असतात. या कंपन्यांचे स्मार्टफोन बाजारात अगदी तीन ते चार हजार रुपयांपासून ते ३० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यामुळे सध्या आपल्यला स्वस्त आणि मस्त असे फोन उपलब्ध झाले आहेत.
भारतीय बाजारपेठ ही किमतीवर चालणारी आहे. हे लक्षात घेऊन भारतीय कंपन्यांनी चांगल्या सुविधा असलेले मोबाइल स्वस्तात उपलब्ध करून दिले आहेत. हे मोबाइल स्वस्त आहेत म्हणून ते चांगले नाहीत असा अनेकांचा समाज असतो. हे काही प्रमाणात सत्य असले तरी ज्यांना जास्त पसे खर्च करावयाचे नसतील त्यांच्यासाठी हे पर्याय अगदी वाईटही ठरत नाहीत. या कंपन्यांचे फोन २० हजार रुपयांत आपल्याला ४० हजार रुपयांचा फोन वापरात असल्याचे भासवतात. म्हणजे तशा ९९ टक्के सुविधा या फोन्समध्ये असतात.
स्मार्टफोन घेताना कोणती काळजी घ्याल-
तुम्ही कोणत्याही कंपनीचे स्मार्टफोन घेत असाल तेव्हा विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यात जर तुम्ही स्वस्त फोन घेत असाल आणि तुमच्या मनात शेकडो प्रश्न पडत असतील तर तुम्ही खालील गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा.
स्क्रीनचा दर्जा- स्मार्टफोन घेताना तुम्ही स्क्रीनचा दर्जा तपासणे नक्कीच योग्य ठरेल. यामध्ये स्क्रीनचा आकार किमान तीन ते चार इंच इतका असावा. त्याचे रिझोल्यूशन किमान ३२० गुणिले ४८० इतके असावे. ही स्क्रीन फोटो पाहण्यासाठी किंवा व्हिडीओ पाहण्यासाठी तशी योग्य नसते. यामुळे तुम्हाला बजेट वाढविणे शक्य असेल तर स्क्रीनचे रिझोल्यूशन हे किमान ४८० गुणिले ८०० इतके असावे.
प्रोसेसरचा दर्जा - स्वस्त मोबाइलमध्ये प्रोसेसर कमी क्षमतेचे असतात. यामुळे त्याची क्षमता तपासून पाहणे गरजेचे आहे. यामध्ये बहुतांश वेळा एक गिगाहर्टझचा सिंगल कोर प्रोसेसर असतो. यामुळे फोन स्लो होणे किंवा काम करताना बंद पडणे असे प्रकार होतात. यामुळे फोन घेताना किमान डय़ुएल कोर असणे गरजेचे आहे. यामुळे फोन चांगल्या प्रकारे चालू शकतो.
कॅमेरा- फोनमध्ये किमान पाच मेगापिक्सेल कॅमेरा असावा. यामध्ये एलईडी फ्लश असावा. यामुळे तुम्हाला फोनमध्ये चांगले फोटो आणि व्हिडीओ आपण रेकॉर्ड करू शकतो. काही फोन एचडी कॅमेरा देतात. पण हे कॅमेरे व्हीएजी रेझोल्यूशनवर आधारित असतात. काही फोनमध्ये फ्रंट कॅमेरा असतो. याद्वारे तुम्ही व्हिडीओ कॉल्स करू शकतात.
ऑपरेटिंग सिस्टीम- अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित फोनच सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. यामुळे फोनमध्ये ४.० ओएस असलेलेच फोन विकत घ्या. जर तसे झाले नाही तर तुम्हाला नवीन अप्स वापरणे शक्य होणार नाही. िवडोज ७ वर आधारित स्वस्त फोन शक्यतो विकत घेऊ नका.
सेवा केंद्रांची यादी- हे फोन घेतल्यावर आपल्या जवळील सेवा केंद्रांची यादी जरूर घ्या. या कंपन्या नवीन असल्यामुळे त्यातील बहुतांश कंपन्याचे सेवाकेंद्र सर्वत्र उपलब्ध नाही आहेत. यामुळे याबाबत जागरूक राहणे अधिक फायद्याचे ठरेल.
फोन्सचे काही पर्याय
इंटेक्स 'अ‍ॅक्वा ऑक्टा'
स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाची एक कॉमन तक्रार आहे, ती बॅटरी लाइफबद्दल.. इंटरनेट, व्हॉट्स अ‍ॅपमुळे बॅटरी झपाझप संपते आणि दिवसातून दोन वेळा चार्ज करूनही ती पुरत नाही. सगळ्यांचीच ही ओरड ऐकल्यानंतर, बॅटरी जास्त काळ टिकावी या दृष्टीनं इंटेक्सनं आपल्या 'अ‍ॅक्वा ऑक्टा'मध्ये सुसज्ज यंत्रणा बसवली आहे. १.७ गिगाहर्ट्झ एमटी ६५९२ ऑक्टा कोअर चिपसेट आणि दोन जीबी रॅममुळे हा फोन सुस्साट वेगानं चालेल, असा कंपनीचा दावा आहे. त्यात अँड्रॉइड ४.२ जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आलेय. दोन सिमच्या या मोबाइलची स्क्रीन सहा इंची असून वजन १८० ग्रॅम आहे. २३०० बॅटरीच्या जोरावर हा फोन सहा तासांचा टॉक टाइम आणि १८० तासांच्या स्टँडबायची खात्री देतो. 'अ‍ॅक्वा ऑक्टा'मध्ये एलईडी फ्लॅशसोबत १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनची इंटरनल स्टोरेज क्षमता १६ जीबी असून ती ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
किंमत- १९, ९९९
मायक्रोमॅक्स कॅन्व्हास
या फोनमध्ये आपल्याला सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध असून त्याचं स्क्रीन पाच इंचांचा आहे. इतकेच नव्हे तर त्याचा प्रोसेसर क्वाड कोर आहे. यामध्ये आपल्याला एचडी व्हर्जनही उपलब्ध आहे. याशिवाय यामध्ये 'ब्ल्वो टू अनलोक' आणि 'स्मार्ट पॉज व्हाईल वॉचिंग व्हिडीओ' असे नवे पर्याय देण्यात आले आहेत. याचा कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा आहे. या सिरीजमध्ये आपल्याला ९६९० पासून ते १७ हजापर्यंतचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
कार्बन टिटानियम
या कंपनीनेही स्मार्टफोन बाजारात आणले असून ते ५.५ इंच डिस्प्लेचे आहेत. हे डिस्प्ले पूर्णत एचडी असे आहेत. यामध्ये क्वाड कोर प्रोसेसर वापरण्यात आला असून कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. हा फोन सॅमसंग गालाक्सी मेगाला चांगला पर्याय ठरू शकतो. याची किंमत १९९९० इतकी आहे. यामध्ये आणखी स्वस्त फोनही उपलब्ध आहेत.

WOMEN SECURITY APPS

महिलांची सुरक्षा हा सध्या सर्व स्तरांवर महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. यातूनच महिलांना किती आणि कशी सुरक्षा देता येईल याबाबत संशोधने सुरू झाली. स्मार्टफोन वापरणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यातूनच महिलांच्या सुरक्षेसाठी खास अॅप्सची निर्मिती सुरू झाली आहे. महिला दिनानिमित्त खास यातील काही अॅप्स.
लाइफ ३६० फॅमिली लोकेटर
हे अॅपदेखील जीपीएस तंत्रज्ञानावर चालते. याद्वारे तुम्ही तुमच्या घरातील लोकांशी कायम कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता. एसएमएस पाठवण्यासोबतच अनेक फिचर्सचाही यात समावेश आहे. तुम्ही नेहमी फिरायला जाता ती ठिकाणे यात सेव्ह होतात. यामुळे तुमच्या घरातील व्यक्ती सध्या कोणत्या लोकेशनवर आहे, ती घरात आहे की नाही, या संदर्भातील सर्व माहिती त्यांना मिळू शकते. यासंदर्भातील अॅलर्ट्स वेळोवेळी घरातील इतर लोकांना मिळत असतात.
अॅप कुठे उपलब्ध?
अँड्रॉइड, ब्लॅकबेरी व सर्व जावा एनेबल्ड फोनवर.
व्हिसल 
नावाप्रमाणेच हे अॅप व्हिसलसारखे काम करते. हे अॅप वापरण्यास अगदी सोपे आहे. संकटकाळात असताना फक्त या अॅपवर टॅप करायचे. आपण टॅप करताच फोनमधून जोरात व्हिसलचा आवाज सुरू होतो. तुमचा फोन सायलेंट मोडवर असेल तरीही हा आवाज ऐकू येतो. यामुळे संकटात असताना आजूबाजूने येणाऱ्यांचे लक्ष सहज वेधले जाईल. यासाठी तुम्हाला कोणत्याही डेटा कनेक्शन अथवा जीपीएसची गरज नाही. हा आवाज ऑन करण्यासाठी फक्त टॅप करायचे, मग आवाज येण्यास सुरुवात होते.
अॅप कुठे उपलब्ध?
सर्व जावा एनेबल्ड अँड्रॉइडवर 
आयसीई
सध्या तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे. अशा तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनात उपयोग करता आला तरच आपण विकसित झालो असे म्हणता येईल. स्वत:च्या सुरक्षेसाठी असलेले हे एसओएस अॅप खरोखर उपयुक्त आहे, असे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. स्मार्टफोनवर वापरता येणारे 'इन केस ऑफ इमर्जन्सी' (आयसीई) हे अॅप मुंबई पोलिसांनी तयार केले आहे. यात चोरी, अपघात, दहशतवादी हल्ले, आग, ट्रेन अपघात आदींबद्दलही माहिती आपल्याला थेट पोलिसांना कळवता येते. याचे वैशिष्टय़ म्हणजे तुमचा अॅलर्ट सरळ पोलिसांकडे जातो. आपण ज्या विभागात असू त्या विभागातील पोलीस स्टेशन्स तसेच पोलीस व्हॅन्समध्ये या अॅपचा अॅलर्ट पोहोचू शकतो, जेणेकरून तुमच्या आसपास असलेली पोलीस व्हॅन तुमच्यापर्यंत पोहोचू शकते.
अॅप कुठे उपलब्ध?
सध्या अँड्रॉइडवर, पण लवकरच सर्व फोन्सवर उपलब्ध होणार.
फाइट बॅक
हे अॅप खासकरून भारतातील स्त्रियांच्या सुरक्षेसाठी बनवले आहे. तुम्ही धोक्यात असताना हे अॅप जीपीएस, एसएमएस, लोकेशन मॅप, जीपीआरएस, तसेच तुमच्या ईमेल व फेसबुकद्वारे तुमच्या नातलगांना कळविते. यात पाच महत्त्वाचे नंबर अॅड करता येतात आणि 'पॅनिक'चे बटन दाबताच त्या नंबरवर अलर्ट जातो. यात तुमचे अचूक लोकेशनही त्यांना मिळते. महत्त्वाचे म्हणजे, हे अॅप फेसबुकवर त्या युजरच्या वॉलवरही मेसेज पोस्ट करते. त्यावर क्लिक करणाऱ्या तुमच्या मित्रालाही तुमचे अचूक लोकेशन समजणार आहे. या अॅपसाठी तुम्हाला फेसबुक स्टेटस नको असल्यास सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही हा पर्याय बंद करू शकता.
* अॅप कुठे उपलब्ध?
अँड्रॉइड, ब्लॅकबेरी व नोकिया स्मार्टफोनवर.
यूजर http://www.fightbackmoblie.com; यावरून हे अॅप डाऊनलोड करू शकतात.
बी सेफ
हे एक जीपीएसवर चालणारे अलार्म अॅप आहे. याद्वारे संकटकाळी तुम्ही यात अगोदर फीड केलेल्या नंबर्सवर अलर्ट जातात. तुम्ही यात तुम्हाला हवे तितके नंबर अॅड करू शकता. यात मोठे लाल रंगाचे 'एसओएस' बटन असते. त्यावर फक्त टॅप करायचे आणि तुम्ही निवडलेल्या नंबरवर अॅलर्ट जातो. या अॅपची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यात रियल टाइम जीपीएस असावे, ज्याद्वारे तुमचा मित्रपरिवार तुमचे अचूक लोकशन मिळवू शकते व तुम्हाला फॉलो करू शकते.
अॅप कुठे उपलब्ध?
अँड्रॉइड, आयओएस, ब्लॅकबेरी फोन्स आणि टॅबलेटवर
सर्कल ऑफ ६
हे अॅप आयओएसवर उपलब्ध आहे. नावाप्रमाणे या अॅपमध्ये तुम्हाला विश्वासू अशा सहा जणांना अॅड करता येते. तुम्ही कोणत्याही संकटात असताना या सर्कलमध्ये तुम्ही आधीच सेव्ह करून ठेवलेला मेसेज व तुमचे लोकेशन त्यांना कळते. २०११मध्ये व्हाइट हाऊस टेक्नॉलॉजी स्पध्रेत याला 'बेस्ट अॅप अगेंस्ट अॅब्युज'चे पारितोषिकही मिळालेले आहे. 
अॅप कुठे उपलब्ध?
अँड्रॉइड, ब्लॅकबेरी व नोकिया स्मार्टफोनवर.
गार्डीयन
मायक्रोसॉफ्ट इंडियाने भारतातील महिलांच्या सुरक्षेसाठी खास 'गार्डीयन अॅप्स' हे अॅप्लिकेशन तयार केले आहे. संकटात असताना नातेवाईक आणि पोलीस, रुग्णालयांशी ताबडतोब संपर्क साधणे यामुळे शक्य होणार आहे. मायक्रोसॉफ्ट िवडो 'अझ्युर क्लाउड सíव्हस' आणि 'िबग मॅप एपीआय' या तंत्रज्ञानाचा यात वापर केला आहे. यात 'ट्रॅक मी'च्या माध्यमातून मित्र आणि कुटुंबीयांशी संपर्कात राहता येणार असून 'एसओएस' अलर्ट बटन दाबताच या स्थळासह धोक्याची सूचना त्यांना देता येणार आहे. तसेच सुरक्षा संस्था, पोलीस आणि रुग्णालयांना ताबडतोब सूचित करता येईल. फोनची मोडतोड झाली तरीही तो हेरता येणार असून यातील 'वन टच व्हिडिओ रेकॉìडग'मुळे ठोस पुरावाही उपलब्ध होऊ शकतो. गाíडयन हे अॅप्लिकेशन वापरण्यासाठी यूझर्सनी मित्रांच्या आणि कुटुंबातील व्यक्तींच्या फोन नंबरचा समावेश यात केला पाहिजे. यूजर्सनी फक्त यातील एसओएस बटन दाबल्यास तात्काळ आपला मेसेज आणि आपण कोठे आहोत याची माहिती आपल्या मित्रांना आणि कुटुंबातील व्यक्तींना मिळेल. या मेसेजसोबतच ईमेलही पाठवला जाईल. 
अॅप कुठे उपलब्ध?
नोकिया स्मार्टफोनवर
हे 'गाíडयन अॅप' http://aka.ms/guardianapp या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.

स्मार्ट धोके...

स्मार्टफोनचा वापर आपल्यला खूप सुखावह वाटत असला तरी त्याचील आपल्या माहितीची काळजी घेतली नाही तर त्याचे धोके खूप मोठे असू शकतील याची जाणीव सध्या सातत्याने सुरू असलेल्या विविध सर्वेक्षणावरून दिसून येत आहे. क्विक हील या कंपनीने नुकत्याच  सादर केलेल्या सुरक्षा अहवालात एकूणच सायबर विश्वात घुसखोरी करू पाहणाऱ्या व्हायरसेसच्याबातीत धोक्याचे इशारे देण्यात आले आहेत. स्मार्टफोन, संगणक किंवा इंटरनेटशी जोडलेल्या कोणत्याही डिव्हाइसमध्ये किती व्हायरसेस नव्याने घुसले आहेत. सध्या मोबाइल हे सायबर गुन्हेगारांचे नवे लक्ष्य कसे बनत आहे याबाबतचा उहापोह यामध्ये करण्यात आला आहे. या अहवालाच्या निमित्ताने..
मोबाइल वापरणाऱ्यांची अनेकदा सॉफ्टवेअर उडाले, अचानक मोबाइलमधील माहिती मिळेनाशी झाली अशा तक्रारी येत असतात. या तक्रारींच्या मागे फोनमध्ये या ना त्या प्रकारे शिरणारे व्हायरसेस कारणीभूत असतात. आपण फोनची स्क्रीन खराब होऊ नये म्हणून स्क्रॅच गार्ड लावतो, तो पडला की त्याच्या बॉडिला कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये यासाठी जाडजूड कव्हर लावतो. पण त्याच्या सॉफ्टवेअरसाठी काळजी घेताना खूप कमी प्रमाणात दिसतो. पण हीच काळजी खूप महत्त्वाची असते. कारण मोबाइलच्या सॉफ्टवेअरला धोका पोहोचला की आपली सगळी माहिती चोरीला जाण्याची भीती तर असतेच याशिवाय या माहितीचा दुरपयोग केला जाण्याची अधिक भीती असते. यामुळे अशा फोन्सच्या सॉफ्टवेअरचीही विशेष काळजी घेणे हे गरजेचे आहे. हाच प्रकार आपल्या जीवनातील इतर इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सच्या बाबतीतही आपण दुर्लक्ष करत असतो. यामुळे इंटरनेटशी जोडल्या गेलेल्या आपल्या सर्व उपकरणांची त्यातील माहितीची काळजी घेण्यासाठी थोडी गुंतवणूक करणे ही काळाची गरज बनली आहे.
मालवेअरचे राज्य
ज्यावेळेस इंटरनेटचा शोध लागला त्याचवेळेस त्याला खीळ घालण्याऱ्या प्रवृत्तींचाही जन्म झाला. यालाच मालवेअर असे म्हटले जाते. याचा वापर सध्या मोठय़ाप्रमाणवर सुरू झाला आहे. कुणाची व्यक्तिगत माहिती, वित्तीय माहिती किंवा व्यवसासायासंदर्भातील माहिती चोरण्याचे काम या माध्यमातून होत असते. यामध्ये सरकारी यंत्रणांची माहिती चोरण्याचे कामही मोठय़ाप्रमाणावर होत असते. सन २०१३मध्ये स्क्रिप्टो लॉकर नावाच्या मालवेअरचा जन्म झाला. हे मालवेअर वापरकर्त्यांच्या फाइल त्याला वापरता येणार नाहीत अशा स्थितीत नेऊन सोडत असे. सन २०१३मध्ये विंडोज या ऑपरेटिंग सिस्टिममधील मालवेअरमध्ये सन २०१२च्या तुलनेत तब्बल ४० टक्कय़ांनी वाढल्याचे निर्दशनास आले आहे. तर अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारीत उपकरणांमध्ये मालवेअरचे प्रमाण हे तब्बल ८०० टक्कय़ांनी वाढल्याचे या अहवालात नमूद केले आहे.
टॉप २० मालवेअर
१. वॉर्म.वेसेन्लोसॉ.एजे७ - हा मालवेअर यादीत अव्वल स्थानावर असून हा मालवेअर आपल्या फ्रीगेट टूल, सुडोकू सोल्वर आणि अल्ट्रासर्फ असे आयकॉन तयार करून बसतो. हा मालवेअर रिमुव्हेबल डिस्कच्या माध्यमातून आपल्या सिस्टिममध्ये प्रवेश करतो. हा मालवेर आपल्या संगणकामधील माहिती आपल्या परोक्ष गोळा करत असतो.
२. वॉर्म.व्हीबी.एचए. - हा मालवेअरही रिमुव्हेबल डिस्कच्या माध्यमातून आपल्या संगणकात प्रवेश करत असतो. हा मालवेअर स्वत:ला 'फोरएव्हर. ईएक्सई' या नावाने आपल्या संगणकात सेव्ह करून घेतो. हा आपल्या संगणकातील होस्ट आणि डाऊनलोड फइल्स बदलण्याचे काम करत असतो.
३. विन३२.वॉर्म.कॉनफिकेर. बी. ३ - हा मालवेअर आपल्या संगणकात नेटवर्कच्या माध्यमातून शिरतो. याचबरोबर रिमुव्हेबल डिस्क आणि कमी शब्दांचा पासवर्ड वापरल्यावरही हा मालवेअर आपल्या संगणकात प्रवेश करत असतो. याच्यामुळे आपण वेबसाइटशी संबंधित सुरक्षा पर्यायांपर्यंत पोहचू शकत नाही. तसेच तो आपल्या सुरक्षा यंत्रणेलाही हानी पोहचवत असतो.
४. वॉर्म ऑटोरन.डब्ल्यूटी - हा मालवेअरही रिमुव्हेबल डिस्क अािण नेटवर्कच्या माध्यमातून प्रवेश करतो. याने आपल्या संगणकात प्रवेश केल्यानंतर तो 'ऑटोरन.आयएनएफ' या नावाने आपले हार्ड ड्राइव्हमध्ये सेव्ह करून घेतो. हा मालवेअर आपल्या रजिस्ट्री माहितीमध्ये बदल करून फइल्स पाहण्यांवर निर्बंध आणतो.
५. वॉर्म कोलोवनेड.ए
६. ट्रोजन. हॅलो.ए१
७. बॅकडोअर.वेरक्युसर.ए
८. वॉर्म.टयुपिम.ए५
९. ट्रोजन ड्रॉपर.सलिटी. यू
१०. ट्रोजन.ऑटोल्ट.जेन
११. ट्रोजन.स्टार्टटर.वायवाय४
१२. डब्ल्यू३२.रॅमिंट.ए
१३. वॉर्म.पलेवो
१४. ट्रोजन.कॉमिस्पोक.एझेड४
१५. वीरटूल. व्हीबीइंजेक्ट
१६. वॉर्म. नेकास्ट.ए३
१७. वॉर्म.डोर्कबोट.ए
१८. विन३२ ब्रोनटोक
१९. ट्रोजन.सिरेफेफ.पी४
२०. आय-वॉर्म.किडो.आयएच
 या मालवेअर्सचा समावेश आहे. हे सर्व मालवेअर्स आपल्या संगणकात विविध मार्गाने शिरकारकरून आपल्या कामावर बंधने आणत असतात.
स्मार्टफोनमधील स्मार्ट व्हायरस
अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारीत फोन्सचा वापर जसा सुरू झाला त्या प्रमाणात तेथेही मालवेअर्स आणि व्हायरसेसची गर्दी होऊ लागली आहे. याचीही टॉप २०ची यादी अहवालात जाहीर करण्यात आली असून यामध्ये खालील मालवेअर्सचा समावेश आहे.
१. अँड्रॉइड.फेकरन.ए
२. अँड्रॉइड.निक्सीस्पाय.ए
३. अँड्रॉइड गिंगर मास्टर
४. अँड्रॉइड. नायलीकर.बी
५. अँड्रॉइड. इवॉल्स. बी
६. अँड्रॉइड.ओबॅड.ए
७. अँड्रॉइड.इन्कोनॉसिस.ए
८. अँड्रॉइड.अप्लॉग.ए
९. अँड्रॉइड.फेकइन्स्ट.एआय
१०. अँड्रॉइड.फेकब्रोव्स.ए२एएबी
११. एक्स्प्लॉइट.लोटूर.एएफ
१२. अँड्रॉइड.फेकलूक.ए५०४६
१३.अँड्रॉइड.बडाओ.ए
१४. अँड्रॉइड.फेकअ‍ॅप
१५. एक्स्प्लॉइट. झेरग्रुश.सी४८
१६. अँड्रॉइड.डाऊनएसएमएस.ए
१७. अँड्रॉइड.मेकपे.ए
१८.अँड्रॉइड.टाटूस.ए
१९. अँड्रॉइड.ऑपफेक.ई
२०. अँड्रॉइड.केएसअ‍ॅप.सी
यातील बहुतांश मालवेअर्स हे आपल्याला नको असलेल्या फाइल्स डाऊनलोड करतात. तर काही मालवेअर्स हे आपल्या माहितीची चोरी करत असतात. या सर्व मालवेअर्सच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांना मोबाइलमधील यंत्रणेवर सहज ताबा मिळवता येऊ शकतो. याशिवाय या अहवालात नमूद करण्यात आलेली इतर निरीक्षणे ट्रोजनच्या प्रमाणात मोठय़ाप्रमाणावर वाढ झाली असून व्हायसेसमध्ये त्यांची संख्या ७७ टक्के इतकी आहे.
बोट्स आणि बॅकडोअर्स स्टोल यांचा भाग १५ टक्के इतका आहे.
वेब बेस्ड मालवेअरमध्ये नवीन मालवेअर्सचा समावेश झाला आहे. यामध्ये वॉटरिंग होल अटॅक्सच्या नावाखाली ऑनलाइन फ्रॉड्स होतात. यामध्ये आपल्या सिस्टिमचा संपूर्ण ताबा हा त्या अँटिव्हायरसकडे जातो. यात आपले ई-मेल्स वाचणे, आपल्या संगणकात सेव्ह केलेली माहिती वाचण, युजरनेम
आणि पासवर्डची चोरी करणे किंवा स्वत:ला कीलॉगर म्हणून इंस्टॉल करून घेणे असे प्रकार होतात.
अ‍ॅप स्टोअरमधील सुरक्षाही चिंतेची बाब आहे. काही अ‍ॅप्सच्या माध्यमातून माहिती गळतीचे प्रमाण आजही सुरू आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मालवेअर सोडण्याचे काम मोठय़ाप्रमाणावर होत आहे. यात सोशल मीडिया इंजिनीअरिंग, मालवेअर, स्पॅम आणि फिशिंग अटॅक्स होण्याचे काम सुरू असते.
अ‍ॅडव्हान्स परसिस्टंट थ्रेट्सचा वापर पैसे कमविणाऱ्या मालवेअर्समध्ये केला जातो.
अ‍ॅपल मॅक ओएस आणि आयओएसही सायबर गुन्हेगारांच्या दृष्टीने सॉफ्ट टार्गेट ठरू लागले आहेत.
२०१४मधील व्हायरसेसचे काही ट्रेंड्स
अ‍ॅडव्हान्स परसिस्टंट थ्रेट्सचा धोका कायम राहणार आहे. इतकेच नव्हे तर हा धोका वाढण्याची शक्यताही आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मालवेअर्स सोडण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता.
मॅक ऑपरेटिंग सिस्टिम आणि आयओएसवरील हल्लय़ांचे प्रमाण वाढण्याची भीती.
सप्लाय चेन हल्लय़ांचे प्रमाण वाढणार आहे.

5 April 2014

स्वस्त आणि मस्त

स्मार्टफोनच्या स्पर्धेतून जन्माला आलेल्या टॅब्लेटने हळूहळू मोबाइलसोबतच कम्प्युटरची बाजारपेठही गिळायला सुरुवात केली आहे. स्मार्टफोनपेक्षा अधिक स्मार्ट आणि कम्प्युटर किंवा लॅपटॉपपेक्षा जरासा कमी अशा मधल्या पातळीवर असलेले टॅब्लेट सध्या शेकडोंनी विकले जात आहेत. ऑफिस, ई मेल, मोठी स्क्रीन, मल्टी टास्किंग यांमुळे टॅब्लेटना 'मिनी लॅपटॉप' समजले जाते. पण तरीही डेस्कटॉप, लॅपटॉप किंवा नोटबुक पीसीच्या तुलनेत ते बरेच पिछाडीवर आहेत. त्यामुळे लॅपटॉपची बाजारामधील नवलाई अजूनही शाबूत आहे. त्यातच आता कमी वजनाचे, त्यातल्या त्यात कमी आकाराचे आणि कमी जाडीचे लॅपटॉप बनवण्याकडे सर्वच कंपन्यांचा कल राहिला आहे. असे असले तरी, किंमत हा अडसर आहेच. उत्तम प्रोसेसिंग स्पीड, जास्त मेमरी किंवा दर्जेदार अतिरिक्त वैशिष्टय़े असलेले लॅपटॉप ४०-५० हजारांच्या पुढेच उपलब्ध आहेत. तरीही सध्या काही असेही लॅपटॉप आहेत, जे ४० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे असूनही त्यामध्ये दर्जेदार वैशिष्टय़े पाहायला मिळतात. सर्वसामान्यांना परवडतील, अशा दरांत उपलब्ध असलेल्या लॅपटॉपवर एक दृष्टिक्षेप :
एसर अ‍ॅस्पायर व्ही ५-४३१
स्वस्तातला किंवा तुलनेने कमी किमतीचा लॅपटॉप म्हटलं की त्यातील स्पेसिफिकेशन्सशी तडजोड करावी लागतेच; पण त्याचबरोबर त्याचा 'लुक'ही सर्वसाधारण किंवा ढोबळ असतो. त्यामुळे बाजारात कमी किमतीत उपलब्ध असलेले ब्रॅण्डेड कंपन्यांचे लॅपटॉप ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाहीत. पण एसरचा अ‍ॅस्पायर व्ही ५-४३१ याबाबतीत निश्चितच ग्राहकांचे समाधान करू शकतो. कमी वजन असलेला, प्रवासात किंवा कार्यालयात कुठेही व्यवस्थित हाताळता येऊ शकणारा, इंटरनेटच्या नियमित वापरासाठी किंवा मूव्हीज पाहण्यासाठी तुम्हाला लॅपटॉप हवा असेल, तर हा एक चांगला पर्याय आहे. यामधील १.५ गिगाहर्ट्झचा सॅण्डी ब्रिज इन्टेल पेंटियम ९८७ प्रोसेसर हा कमी क्षमतेचा प्रोसेसर आहे. मात्र, या सोबतच इन्टेल एचडी ग्राफिक्स कार्ड, दोन जीबी रॅम आणि ५०० जीबीची हार्डडिस्कही पुरवण्यात आली आहे. विंडोज ७ होम बेसिक (६४ बिट) ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या या लॅपटॉपमध्ये ब्लूटूथ आणि वायफायची सुविधा पुरवण्यात आली आहे. मात्र, या दोघांसाठी स्वतंत्र इंडिकेटर्स नसल्याने किंचित गैरसोय होते. कीबोर्डचा आकार मोठा असला तरी त्यासाठी स्वतंत्र न्युमरिक कीपॅडचा बळी देण्यात आला आहे. लॅपटॉपची स्क्रीन १४ इंच आकाराची आहे. 
किंमत २५,५०० रुपयांपर्यंत.

इंटरनेट व्यापाराला चालना!

सध्याच्या आधुनिक युगात एखाद्या वस्तूची खरेदी करण्यासाठी बाजारात जाण्याची आवश्यकताही लागत नाही. इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला हवी ती वस्तू घरबसल्या मागवता येते. अगदी पेनड्राइव्हपासून टीव्ही, फ्रिजपर्यंत आणि कपडय़ांपासून दागिन्यांपर्यंत असंख्य वस्तू ई-बाजारात उपलब्ध असतात. आपण फक्त मागणी करायची, त्या वस्तू घरपोच आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. भारतात तर इंटरनेट वापरकर्त्यांकडून नेहमीच ई-खरेदी केली जात असून, त्यामुळे ई-बाजार भरभराटीला आला आहे.

भारतामध्ये 'फ्लिपकार्ट'www.flipkart.com, 'ईबे इंडिया'www.ebay.in, 'शॉपक्लूज.कॉम'www.shopclues.com, 'म्यानत्रा'www.myntra.com, 'होमशॉप १८'www.homeshop18.com,'येभी'www.yebhi.com,'स्नॅपडील'www.snapdeal.com यांसारखी अनेक संकेतस्थळे आहेत, ज्यांवर ई-व्यापार चालतो. यातील आघाडीचे ई-व्यापार संकेतस्थळ असलेल्या 'ईबे इंडिया'ने नुकताच आपला 'कॉमर्स ३.०' हा अहवाल प्रकाशित केला. इंटरनेटवरील व्यापाराचे महत्त्व आणि त्याचे फायदे सांगणे हा या अहवालाचा उद्देश आहे. भारतातील विविध व्यापाऱ्यांना इंटरनेटच्या माध्यामातून जोडणे आणि ग्राहकांना विविध वस्तू उपलब्ध करून देणे हाही महत्त्वाचा उद्देश ईबेचा आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून भारतातले उद्योजक कशा प्रकारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करत आहेत आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला कशा प्रकारे चालना मिळत आहे, हे सांगण्याचा प्रयत्न या अहवालाने केला आहे. व्यापाराच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा ई-व्यापार किती सोयीस्कर आणि प्रभावशाली आहे, याची माहितीही या अहवालात आहे. भारतात ई-व्यापार वाढावा, त्याची भरभराट व्हावी यासाठी अनेक संकेतस्थळे प्रयत्न करत आहेत. भारतातील व्यापारी आणि ग्राहकांच्या खरेदी-विक्रीच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी नव्या युगातले हे तंत्रज्ञान कारणीभूत ठरत आहेत. भारतात ई-व्यापार रुजवण्यासाठी अनेक अनेक संकेतस्थळे प्रयत्नशील आहेत, मात्र त्यात 'ईबे'चे योगदान महत्त्वाचे आहे. ''भारतीय ई-व्यापार क्षेत्राची भरभराटी व्हावी, यासाठी ईबे सर्व उद्योजकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्री स्तरावर समान संधी उपलब्ध करून देत आहे. या अहवालाच्या माध्यमातून भारतातील लघू आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योजकांना ई-व्यापारामुळे तुमचा कसा फायदा होऊ शकतो आणि येथे कशा प्रकारे मुबलक संधी आहे, याची झलक दाखवू इच्छितो,'' असे 'ईबे'च्या वतीने सांगण्यात आले आहे. एखाद्या उद्योगाला वा व्यापाराला जागतिक ग्राहक मिळवून देण्यासाठी उद्योजकाला बरेच प्रयत्न करावे लागतात. वस्तूची निर्यात करणे, परदेशी बाजारपेठांमध्ये वस्तू विकण्यास आणणे, तेथील ग्राहक मिळवणे, मार्केटिंग अशा अनेक माध्यमांतून त्या वस्तूची अनेक देशांमध्ये विक्री केली जाते. मात्र इंटरनेटच्या माध्यमातून जर वस्तूची विक्री केल्यास जगभरातील ग्राहक सहज मिळू शकतात. सध्या रिटेल क्षेत्रात एफडीआय आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. एफडीआयमुळे जगभरातील विविध कंपन्यांना जागतिक ग्राहक लाभणार. मात्र ई-व्यापारामुळे सहजतेने अनेक कंपन्यांच्या वस्तूंना जागतिक ग्राहक मिळत आहेत. त्यामुळेच 'ईबे इंडिया'ने एक पाऊल पुढे टाकत व्यापारी वर्गाला आधुनिक बनवण्यासाठी आणि नवनवीन गोष्टींची माहिती देण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. भारतातील विविध व्यापाऱ्यांना त्यामुळे जगभरातील ग्राहक मिळतील, याच उद्देशाने ईबे इंडिया देशभरातील असंख्य लघू आणि मध्यम उद्योजकांना मदत करणार आहे.


ई-व्यापाराचे फायदे
* ईबेच्या विक्रेत्यांना सर्वसाधारणपणे जगभरातील ३१ बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळतो. वस्तूविक्रीची पारंपरिक पद्धत अवलंबणाऱ्या विक्रेत्यांना वस्तूच्या विक्रीतून १० टक्के नफा मिळतो. मात्र ई-व्यापार करणाऱ्यांना ९८ टक्के नफा मिळतो. ई-व्यापार करणाऱ्यांना अंतराच्या मर्यादा नसतात. पारंपरिक व्यापार करणाऱ्यांना बाजारपेठांमध्ये जाऊन वस्तू विक्रीस उपलब्ध करून द्यावी लागते. ई-व्यापार करणाऱ्यांनी एकदाच इंटरनेटवर वस्तू उपलब्ध केल्यास जगभरातील ग्राहकांना त्याची माहिती मिळू शकते. ब्रिटन, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांशी ईबेवरून भारताचा व्यापार होत आहे. ऑस्ट्रेलिया व रशिया या देशांशी अधिक व्यापार करण्याची संधी भारताला इंटरनेटवरून मिळते.
* ई-व्यापारामुळे लघू उद्योजकांना समान संधी उपलब्ध होत आहेत. ई-व्यापारात मोठय़ा कंपन्यांचे वर्चस्व कमी असते आणि नव्या कंपन्यांचा एकंदर विक्रीत मोठा वाटा असतो. ई-व्यापारामध्ये प्रवेश करण्यासाठी कमी अडथळे असल्याने नव्या कंपन्या तिथे सहज उपलब्ध होतात. त्याचा फायदा 'ईबे'ला नेहमीच झाला आहे. त्यामुळे त्यांनी नव्या व्यापाऱ्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
* ई-व्यापारामुळे राष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते. दूरवरच्या ग्राहक आणि विक्रेत्यांना एकत्र आणण्याचे काम ई-व्यापार करतात. ईबे इंडियावरचे देशांतर्गत व्यापारी १९ राज्यांमध्ये पसरलेले आहे. दिल्ली व महाराष्ट्रात सर्वाधिक ई-विक्रेते आहेत, तर केरळ, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक ई-ग्राहक आहेत.
* इंटरनेटवर उच्च दर्जाच्या स्पध्रेमुळे किमती कमी असतात. त्याचा फायदा ग्राहकांनाच होतो. अनेकविध उत्पादनांची उपलब्धतता असल्याने ग्राहकांना पायपीट करावी लागत नाही. केवळ माऊसच्या आधारे 'क्लिकक्लिकाट' करण्याची गरज असते. ज्या वस्तू विकल्या जात नाहीत, त्याही विक्रीयोग्य बनतात, याचा फायदा विक्रेत्यांसह ग्राहकांनाही होतो. जगभरातील 
सर्व व्यापार इंटरनेटवर आले, 
तर त्याचा फायदा सर्वानाच होणार आहे.
ई-व्यापार वाढवण्यासाठी आवश्यकता
* ई-व्यापाराची क्षमता अद्याप आपल्या लक्षात आलेली नाही. ई-व्यापाराच्या वृद्धीसाठी योजनात्मक आणि विचारात्मक पावले उचलणे आवश्यक आहे. सध्या या क्षेत्रात अनेक बंधने आणि मर्यादा आहेत. या मर्यादा पार करणे आवश्यक आहे. ई-व्यापारवृद्धीसाठी खालील गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. ' रोखीचा वापर कमी करणाऱ्या अर्थव्यवस्थेला चालना ' सीमाशुल्क प्रक्रियेचे सुलभीकरण ' चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी ' ट्रेडमार्कच्या जाचक नियमांचे शिथिलीकरण ' विक्रेत्यांसाठी वाहतुकीच्या दरात कपात करणे.

मोबाइलची सुरक्षा

स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्यांची संख्या ज्या प्रमाणात वाढतेय त्या प्रमाणात स्मार्ट फोनची यंत्रणा बिघडवण्यासाठी अनेक व्हायरसेसही बाजारात येऊ लागले आहेत. हे व्हायरसेस आपल्या फोनची खूप हानी करू शकतात. यामुळे यांच्यापासून जपून राहणे हे आपल्याला केव्हाही चांगले. विशेषत: एकमेकांकडून माहितीची देवाण-घेवाण करताना, वाय-फाय नेटवर्कचा वापर करताना हा व्हायरसचा धोका अधिक असतो. यामुळे मोबाइलची काळजी घेणे हे महत्त्वाचे झाले आहे. मोबाइलमध्ये कोणते अ‍ॅण्टीव्हायरस तुम्ही टाकू शकता याची माहिती आपण जाणून घेऊ या.
कॅस्पर्सस्काय
हा अ‍ॅण्टीव्हायरस कॉम्प्युटरसाठी तर प्रसिद्ध आहेच पण मोबाइलसाठीही तितकाच उपयोगी आहे. 'कॅस्पर्सस्काय मोबाइल सिक्युरिटी १४' हे त्याचं लेटेस्ट व्हर्जन आहे. हा अ‍ॅण्टीव्हायरस तुमच्या स्मार्ट फोनची फोन मेमरी, मेमरी कार्ड पूर्णपणे स्कॅन करतो. मालवेअर्स, व्हायरस फाइल डिलीट करण्यास मदत करतो. यामुळे तुमच्या स्मार्ट फोनमधील डेटा व्हायरसपासून सुरक्षित राहतो. या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला ब्लॅकलिस्टची सुविधा उपलब्ध आहे ज्यामुळे तुम्ही नको असलेल्या नंबरवरून येणारे कॉल्स आणि एसएमएस ब्लॉक करू शकता.
प्रायव्हेट प्रोटेक्शन हे कॅस्पर्सस्काय मोबाइल सिक्युरिटी १४ मधील प्रमुख वैशिष्टय़. यामुळे तुम्हाला हवे असलेले कॉन्टॅक्ट्स, एसएमएस, कॉल लॉग्स इतरांपासून लपवू शकता. या अ‍ॅण्टीव्हायरसमधील थेट प्रोटेक्शनमुळे तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तरी एका एसएमएसद्वारे तुम्हाला त्यात नव्याने घातलेल्या सिम कार्डची माहिती मिळू शकते. गुगल मॅप्स आणि जीपीएसच्या माध्यमातून तुम्ही चोरीला गेलेल्या फोनचं लोकेशन शोधू शकता. ३० दिवसांचे ट्रायल व्हर्जन संपल्यावर तारीख बदलून हे सॉफ्टवेअर वापरू नका त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम क्रॅश होऊ शकते. ट्रायल व्हर्जननंतर हे सॉफ्टवेअर वापरायचे असेल तर वर्षभराचे लायसन्स व्हर्जन घेणंच बरं. कॅस्पर्सस्काय मोबाइल सिक्युरिटी हा अ‍ॅण्टी व्हायरस अ‍ॅण्ड्रॉइड, विंडोज स्मार्ट फोन्ससाठी उपलब्ध आहे.
ईएसईटी
तुमचा स्मार्ट फोन व्हायरस, स्पॅम, फायरवॉल यांपासून सुरक्षित ठेवण्याचे काम ईएसईटी करतो. यामध्ये फायरवॉल प्रोटेक्शन, स्पॅम फिल्टर, अ‍ॅण्टी थेफ्ट असे फिचर्स आहेत. विंडोज आणि सिम्बियन फोन्ससाठी तो जास्त चांगला आहे. त्यात ब्लॅकलिस्ट व व्हाइट लिस्ट असे ऑप्शन आहेत. ब्लॅकलिस्टमध्ये नको असलेल्या नंबर्सचे कॉल्स किंवा मेसेजेस ब्लॉक करता येतात. व्हाइट लिस्टमध्ये तुम्ही विश्वासातील माणसांचे कॉन्टॅक्ट्स अ‍ॅड करू शकता.त्यामुळे फोन चोरीला गेला किंवा त्यातील सिमकार्ड बदलल्यास, लोकेशनसहित सर्व डिटेल्स व्हाइट लिस्टमधील नंबर्सवर एसएमएसद्वारे मिळतात. यामध्ये इनबिल्ट टास्कमॅनेजर आहे ज्यामध्ये तुम्ही रिनग अ‍ॅप्स, फोनमधील फ्री स्पेस, फोनची बॅटरी लाइफ इ. गोष्टी पाहू शकता. हा डिव्हाईस तुम्हाला पासवर्ड प्रोटेक्टेड ठेवता येतो. यामुळे तुम्ही सिक्युर वेब ब्राऊिझग करू शकता. डाऊनलोडिंगमध्ये संशयास्पद फाइल्स दिसल्या तर हा अ‍ॅण्टीव्हायरस लगेचच त्या डिलीट करतो. या फोनचे ट्रायल व्हर्जन ३० दिवसांचे असते. त्यानंतर वापरायचे असल्यास लायसन्स व्हर्जन तुम्हाला विकत घ्यावे लागेल. तुमचा चोरलेला किंवा हरवलेला डिव्हाईस शोधण्याच्या बाबतीत मात्र या अ‍ॅण्टीव्हायरसला काही मर्यादा येतात.
वेबरूट
सध्या चलती असलेल्या अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्ट फोन्ससाठी हे वेबरूट मोबाइल सिक्युरिटी अ‍ॅण्टीव्हायरस सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. इन बिल्ट अ‍ॅप्लिकेशन स्कॅनर हे याचं खास वैशिष्टय़. अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्ट फोनमध्ये डाऊनलोड केल्या जाणाऱ्या अ‍ॅप्समधून येणाऱ्या धोकादायक व्हायरस आणि मालवेअर्स फाइल्स हा डिलीट करतो. इन बिल्ट अ‍ॅप्स स्कॅनरमुळे तुम्ही थर्ड पार्टी सॉफ्टवेअर्स डाऊनलोड केले तरी ते ऑटोमॅटिकली स्कॅन होतात. एखाद्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये व्हायरस फाइल असल्यास वेबरूट त्याचं इन्स्टॉलेशन रिजेक्ट करतो. त्यामार्फत येणाऱ्या फाइल्स ब्लॉक करतो. कॉल आणि एसएमएस ब्लॉकिंगची सुविधाही यामध्ये आहे. सिक्युअर वेब ब्राऊझिंग हे वेबरूटमधील महत्त्वाचे वैशिष्टय़. ज्यामध्ये तुम्ही वेब पेज ओपन केल्यावर वेब लिंक्स, यूआरएल लिंक्स धोकादायक असतील तर ते वेबपेज आधीच ब्लॉक होतं. वेबरूटच्या पेड व्हर्जनमध्ये तुम्हाला डिव्हाईस लॉक, वाईप डेटा, डिव्हाईस स्कीम, या फीचर्सचा अनुभव घेता येईल. जर तुमचा फोन कोणी चोरला तर डिव्हाईस लॉकमुळे सिम कार्ड बदलल्यावर आपोआपच तुमचा फोन लॉक होईल. वाईप डेटामध्ये तुमच्या चोरीला गेलेल्या या फोनमधली पर्सनल माहिती ऑॅनलाइन डिलीट करू शकता. डिव्हाईस स्कीम अलर्ट इनेबल असेल तर तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवल्यास गुगल मॅप्सच्या साहाय्याने वेबरूट तुमच्या फोनची लोकेशन सर्च करू शकतो. हा अ‍ॅण्टी व्हायरस अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्ट फोन्ससाठी बेस्ट आहे परंतु तो इतर कोणत्याच स्मार्ट फोन्ससाठी उपलब्ध नाही.
नेटक्वीन मोबाइल सिक्युरिटी
मोबाइलसाठी वापरला जाणारा हा प्रचलित अ‍ॅण्टीव्हायरस आहे. तुमचा पूर्ण फोन जलद स्कॅन करण्यास हा मदत करतो. ऑटोमॅटिकली व्हायरस डेटाबेस अपडेट करणे, लॉस्ट फोन लोकेशन, प्रायव्हसी प्रोटेक्शन, ट्रॅफिक मॅनेजर, सिस्टम ऑप्टिमायझर, कॉन्टॅक्टस् बॅक अप ही या मोबाइल सिक्युरिटीची वैशिष्टय़ं आहेत. सध्या यामध्ये नेटक्वीन मोबाइल सिक्युरिटी ७.६ हे लेटेस्ट व्हर्जन आहे. स्मार्ट फोनमध्ये व्हायरस, मालवेअर्स, फोन हॅकर्सपासून तुमचा डाटा सेफ ठेवण्याचे काम हा करतो. त्यातील ट्रॅफिक मॅनेजरमुळे तुम्हाला महिन्याभरात वापरलेल्या डेटाचे प्रमाण कळू शकते, तो हॅकर्सना ब्लॉक करतो. प्रायव्हसी प्रोटेक्शन, फोन लोकेटर, सिक्युअर डेटा ब्राऊिझग हे फीचर्सदेखील नेटक्वीनमध्ये आहेत. तुम्ही कॉन्टॅक्टस्चा एस डी कार्ड वर बॅकअप घेऊ शकता. यामधील अ‍ॅन्टीलॉस्ट फिचरमध्ये साऊंड अलार्मची सुविधाही उपलब्ध आहे. तसंच हे फीचर तुमच्या हरवलेल्या फोनची लोकेशन सुद्धा ट्रेस करू शकते. अगदी सहजरीत्या वापरता येण्यासारखे हे सॉफ्टवेअर आहे. याचं ट्रायल व्हर्जन ३० दिवसांचे असते त्यानंतर तुम्हाला ते रजिस्टर करावे लागते. पण यामध्ये ऑनलाइन डेटा बॅकअप घेण्याची सुविधा नाही. अ‍ॅण्ड्रॉइड, िवडोज, सिम्बियन, ब्लॅकबेरी स्मार्ट फोन्समध्ये हे सॉफ्टवेअर सपोर्टेबल आहे.
अवास्त
अवास्त ही अ‍ॅण्टीव्हायरसची चांगली कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीचाही मोबाइल अ‍ॅण्टीव्हायरस असून यामध्ये आपण विविध प्रकरची माहिती स्कॅन करू शकतो. यामध्ये आपल्याला व्हायरस स्कॅनर, प्रायव्हसी अ‍ॅडव्हायजर, अ‍ॅप्लिकेशन मॅनेजमेंट, शील्ड कंट्रोल, एसएमएस अँड कॉल फिल्टर, फायरवॉल, नेटवर्क मीटर अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये आपण एखादी साइट ब्लॉक करण्यापासून अनेक सुरक्षेच्या गोष्टी पूर्ण करून ठेवू शकतो. आपण माहितीची देवाण-घेवाण करताना कोणत्याही प्रकारचा व्हायरस त्यामध्ये असेल तर आपल्याला हा अ‍ॅण्टीव्हायरस वेळीच सूचित करतो. मग आपण ती माहिती घ्यायची की नाही हा आपला प्रश्न असतो. इतकेच नव्हे तर ती माहिती स्कॅन करण्याची सुविधाही यामध्ये आहे. यामुळे आपण आलेली माहिती स्कॅनिंग करून घेऊन त्यातील व्हायरस काढून टाकला जातो.
मॅकेफी
अ‍ॅण्टी व्हायरससाठी प्रसिद्ध असलेल्या कंपन्यांमध्ये 'मॅकेफी'चा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. स्मार्ट फोनमध्ये व्हायरस, स्पायवेअर्स, मालवेअर्सपासून तुमचा डेटा प्रोटेक्ट करण्याचे काम मॅकेफी करतो. 'साईट अ‍ॅडवायजर' हे यातील महत्त्वाचं वैशिष्टय़ं. ज्यामुळे तुम्ही सुरक्षितरीत्या नेट सर्फिग आणि ऑॅनलाइन शॉिपग करू शकता. तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर हा अ‍ॅण्टीव्हायरस तुमचा डेटा प्रोटेक्ट करतो. यामधील सेफगार्डमुळे स्पायवेअर्स, मालवेअर्सपासून तुमचा फोन सुरक्षित राहतो. तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तरी गुगल मॅप्स आणि जीपीएसच्या साहाय्याने मॅकेफी तुमच्या डिव्हाइसची लोकेशन ट्रेस करू शकतो तसंच त्यातील बदललेल्या सिम आणि त्यामधून केल्या जाणाऱ्या कॉल्सची माहिती देऊ शकते. याच्या साहाय्याने तुम्ही हवा तिथे डेटा बॅकअप घेऊन कुठेही अ‍ॅक्सेस करू शकता तसेच तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर त्यावरील डेटा तुम्ही नवीन फोनवर रिस्टोअर करू शकता. हा अ‍ॅण्टीव्हायरस सोशल नेटवर्किंग साइट्स, ईमेल, एसएमएस, एमएमएसमधून येणाऱ्या धोकादायक लिंक ब्लॉक करतो. याचे ट्रायल व्हर्जन सात दिवसांचे असते. त्यानंतर जर तुम्हाला तो वापरायचा असेल तर लायसन्स व्हर्जन विकत घ्यावं लागेल. काही वेळा या अ‍ॅण्टीव्हायरसमुळे तुमचा स्मार्टफोन थोडा स्लो होतो. अ‍ॅण्ड्रॉइड, विंडोज, सिम्बियन, ब्लॅकबेरी स्मार्ट फोन्ससाठी तुम्ही तो वापरू शकता.